१ -अर्जुन विषाद योग
धृतराष्ट्र म्हणाला हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरूक्षेत्रात युद्धासाठी तयार असलेले माझे पुत्र व पांडुकुमार काय करत आहेत ते मला सांग. संजय म्हणाला, पांडवांच्या सैन्याचा व्युह पाहुन दुर्योधन भीष्मा जवळ जाऊन म्हणाला, तुमचा शिष्य ध्रुष्टद्युम्नाने रचलेला व्युह पहा. पांडवाची ही प्रचंड सेना दले पहा.
अनेक धनुर्धारी आहेत तसेच द्रुपद, सात्यकी, विराट हे ही रणांगणात भीम, अर्जुना समान शोभत आहेत.
वीर असे ध्रुष्टकेतु व चेकितात, महान असे पुरूजित, कुंतिभोज, शैब्य, शूर असा ऊत्तमौजा आणि पराक्रमी युधामन्यु, द्रौपदीचे पुत्र व अभिमन्यु. द्विजश्रेष्ठा ! आता आपल्याकडील सेनानायक होण्यासारखे प्रधान वीर पण सांगतो. आपण स्वत: सारख्या व्यक्ति व भीष्म, कृपाचार्य, कर्ण, भुरिश्रवा, अश्वत्थामा आणि विकर्ण.
हे सर्वजण शूर, शास्त्रात पारंगत आणि य़ुद्धात अनुभवी असुन माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. भीष्मरक्षित असे आपले सैन्य दल (बल) अमर्याद आहे. भीमरक्षित सेना मला मर्यादित दिसते आहे व सर्व सैन्याला म्हणाला स्वस्थानावर दक्ष राहुन लक्ष ठेवा व भीष्म रक्षणासाठी तुमचे सामर्थ्य एकटवा. भीष्मानी केलेला शंखनाद हा जणु सिंहनादच वाटतो आहे. तो ऐकुन दुर्योधनाला अत्यंत आनंद झाला. नंतर शंख, ढोल व रणवाद्यांच्या आवाजाने गगन दुमदुमुन गेले.
शुभ्र अश्व रथात बसुन पांडव व श्रीकृष्ण आले. त्यांनी त्यांचे दिव्य शंख स्व प्राणाने फुंकले. कृष्ण व अर्जुनाने पांचजन्य, देवदत्त हे शंख फुंकले. भीमाने स्वत:चे नाव धन्य करणारा पांड्रु महाशंख फुंकला. कुंतीपुत्र युधिष्ठीराने अनंत विजय फुंकला. नकुल व सहदेव यांनी
चांगला आवाज करणारा मणिपुष्पक फुंकला. सात्यकी, विराट, सेनापती धृष्टद्युम्न, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, आणि हे राजा ! अभिमन्यु हे पण वेगवेगळे शंख वाजवत आहेत. या सर्वांच्या प्रचंड आवाजाने आकाश व पृथ्वी थरथरु लागली आहे. धृतराष्ट्र पुत्रांच्या ह्रदयाचा थरकाप झाला आहे. ज्याच्या रथावरील ध्वजावर हनुमान आहे अशा अर्जुनाने कौरव युद्धासाठी सज्ज आहेत असे पाहून आपले धनुष्य उचलले आहे.
कृष्णाशी अर्जुन काय बोलत आहे पहा । अर्जुन म्हणाला , हे अच्युत रथ सैन्यांच्या मधोमध नेउन ठेव. मला येथे युद्धासाठी कोण कोण आले आहे ते पहावयाचे आहे. कोण राजे जमलेले आहेत व कोण कौरवांचे बाजुनी लढण्यासाठी आले आहेत ते पहातो. अर्जुनास दिसले ते सर्व त्याचे चुलते, वाडवडील, गुरूबंधु, पुत्र पौत्र, मित्र, मामा. दोन्ही सैन्यामधे मित्र व नातेवाईक दिसले. असे सर्व रक्ताच्या नात्याचे लोक पाहून करुणेने व्याकूळ होऊन अर्जुन दु:खाने म्हणाला, हे सर्व माझेच आप्त आहेत. माझ्या घशाला कोरड पडते आहे, शरीर शिथील पडु लागले आहे, शरीराला कंप येतोय, धनुष्याचे त्वचेला चटके बसत आहेत. माझे मन भरकटते आहे, ऊभे राहणेही अशक्य झाले आहे.
केशवा ही उलटी(विपरीत) लक्षणे दिसत आहेत. आपल्या प्रिय अशा सर्वाना मारुन कोणते श्रेय मिळवायचे. कृष्णा, मला विजय नको, अशा राज्याचे भोग मला कदापिही नकोत. या रणांगणावर जे आपले प्राण व धनाचा विचार न करता युद्धासाठी ऊभे आहेत त्यानाच राज्य सुख द्यावे. गुरुजन, मुले, आजोबा, सासरे, मेहुणे, नातु, मामा, नातेवाईक, याना जरी यांनी मला मारले तरी मारु इच्छीत नाही. मला पृथ्वीच काय त्रिलोक पण नको. या धृतराष्ट्र पुत्राना मारुन काय सुख मिळणार. यांना मारले तर पापच लागेल. हे कृष्णा कौरवाना मारण्यात मला कुठेच सुख दिसत नाही. मित्र द्रोह, कुळ नाशा सारखे हे पाप आहे. लोभी अशा याना काही दिसत नसले (कळत नसले) तरी हे जनार्दना, मी हे पाप का करु? (या पापाचा त्याग का नको करु). याचा परिणाम म्हणजे कुळाचा नाश होणार आहे हे कळत का नाही ?. पुर्वापार चालत आलेले कुलधर्म बुडवुन कुळाचा नाश होईल. कुळामधे अधर्म पसरेल. कृष्णा, धर्म सोडला तर लेकी सुना बिघडतील. हे देवा , वर्ण संकराचे संकट कोसळेल.(अवांछित प्रजा निर्मिती चे) कुळातील तर्पण श्राद्धे थांबतील. कुळ आणि कुळ बुडव्याना नरकात जावे लागेल.
वर्ण संकर दोषाने कुळाचा घात करणाऱ्यांचे जाती धर्म उखडले जातील. हे जनार्दना, मी असे ऐकले आहे की , कुलधर्म संपताच मनुष्याला अनंत काळासाठी नरकात जावे लागते. आम्ही बुद्धिमान असुनही हे महा पाप करण्यास तयार झालो आहोत. सुख आणि राज्य लोभाने मारण्यासही तयार आहोत. मला निशस्त्र राहुन, कौरवानी जरी शस्त्र घेउन प्रहार केला तरी प्रतिकार न करणेच योग्य वाटते. असे बोलुन अर्जुन शोकमग्न होउन धनुष्य बाण खाली ठेवुन रथा मधे बसला.
अर्जुन विषाद योग नावाचा हा प्रथम अध्याय.
शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९
Bhagwadgita
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)